उद्रेक न्युज वृत्त
नाशिक :- भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये येणार आहेत.यानिमित्त नाशिक काँग्रेसकडून राहुल गांधींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात आहे.त्यातच आता राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणेचे बॉम्बने उडवून देण्याचा कॉल काही दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणेचे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन नाशिक पोलीस आयुक्तालयात आठ दिवसांपूर्वी आला होता.त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चौकशी करत धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.तो माथेफिरू असल्याचे निदर्शनास आले आहे.याबाबतची माहिती नाशिक पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिली असून संबंधित व्यक्तीवर पोलसांची नजर कायम आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी सांगितले की,आठ ते दहा दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षात एक कॉल आला होता.राहुल गांधी यांच्या हत्येचा कट रचला गेला आहे.राजीव गांधींप्रमाणेच राहुल गांधींना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली होती. या धमकीची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक इतर शाखांनी याबाबत शहानिशा केली असता ज्या व्यक्तीने फोन केला होता.तो व्यक्ती नाशिक येथील गंगापूर हद्दीत राहत असून मानसिक आजाराने त्रस्त आहे.तसेच गेल्या दहा वर्षांपासून त्या व्यक्तीला दारू पिण्याचे व्यसन आहे.व्यक्तीने फोन हा दारूच्या नशेत केला होता.या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.संपूर्ण अहवाल केंद्रीय तपास यंत्रणांना पाठवण्यात आला आहे.तसेच राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात असून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्रा एकूण ६ जिल्ह्यांमधून जाणार आहे.मालेगाव येथून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार असून, नाशिकमार्गे ठाणे येथे यात्रेचा समारोप केला जाणार आहे.भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत १५ राज्यांमधून जाणार आहे.यामध्ये ११० जिल्हे,सुमारे १०० लोकसभेच्या जागा आणि ३३७ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल.हा प्रवास पूर्ण करण्यासाठी अंदाजे ६६ दिवसांचा कालावधी लागणार आहे.अशातच धमकीचे फोन येणे ही लाजिरवाणी बाब असून यावर त्वरित आळा घातला जावा; अशी मागणी केली जात आहे.

