- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय काल,३ ऑक्टोंबरला केंद्राने घेतल्याने मराठी मायबोली बद्दल अनेक दिग्गज तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आनंदोत्सव साजरा केला.केंद्राने मराठीसह बंगाली,पाली,आसामी,प्राकृत या ५ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.अशातच अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय? ‘तो’ कोणत्या निकषांवर दिला जातो?
एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटणे. भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.भाषा भवन उभारणे,भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे,ग्रंथलये उभारणे,देशभरातील विद्यापीठे किंवा इतर संस्थांमार्फत भाषेचा प्रसार देखील यातून करता येतो.विशेष म्हणजे,भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्यासाठी व्यवस्था केली जाणार.प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार.अभिजात दर्जा मिळाल्याने या भाषेतील विद्वान व्यक्तींना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना देखील करता येते.
आता भाषेला दर्जा तर मिळाला आहे; मात्र एखाद्या भाषेला अभिजात दर्जा कोणत्या निकषांवर दिला जातो? तर अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असावी लागते.या भाषेत समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी लागते.महत्त्वाचे म्हणजे हे साहित्य मूळ भाषेतीलच असावे,दुसऱ्या भाषांमधून अनुवाद केलेले नसावे.तसेच भाषेचा प्रवास हा अखंडित असावा. प्राचीन भाषा आणि सध्या वापरतो त्या भाषेतील नाते ठळक दिसावेत.या काही अटी आहेत; याच निकषांवर भाषेला अभिजात दर्जा दिला जातो.
भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी राज्यसरकारकडून हा प्रस्ताव पाठवल्यानंतर साहित्य अकादमीकडून भाषेच्या पुराव्यांची रीतसर तपासणी केली जाते, तथ्यांची पडताळणी केली जाते,काही त्रुटी आहेत का? ते बघितले जाते.या सगळ्या प्रक्रियेतून भाषा पास झाली की,मग केंद्रीय सांस्कृतिक विभागाकडे भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शिफारस केली जाते व मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मांडला जातो; अशी संपूर्ण प्रक्रिया भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी करण्यात येते.
- Advertisement -

