उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम,डोंगराळ व दऱ्याखोऱ्यांत वसलेला जिल्हा आहे.जिल्ह्यात मागील दोन वर्षांपर्यंत राशन वाटप करीता देण्यात आलेले मशिन कधी नेटवर्क अभावी तर कधी सर्व्हर डाॅऊनमुळे बरोबर काम करीत नसल्याने तसेच कार्ड धारकांचे अंगठ्याचे ठसे व्यवस्थित घेतल्या जातीलच याची शास्वती नसल्याने जिल्ह्यातील राशन दुकानदारांचे पाॅश मशिन बंद करून राशन ऑफलाईन वाटप करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित करण्याची मागणी गडचिरोली जिल्हा राशन दुकानदार संघटेचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भर्रे यांनी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डाॅ.नामदेव किरसान यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दिलेल्या निवेदनात भर्रे यांनी नमुद केले आहे की, जिल्ह्यात नेटवर्क अभावी शासकीय स्तरावरुन देण्यात आलेले पाॅश मशिन व्यवस्थीत काम करीत नाहीत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्ड धारक अन्न धान्यापासून वंचित राहात आहेत.यामुळे राशन दुकानदार व कार्ड धारक यांच्यात नेहमीच खडके उडत असुन राशन दुकानदारांवर वारंवार आक्षेप घेऊन मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत आहेत. जिल्हा अतिदुर्गम भागात वसलेला असल्याने नेटवर्कची समस्या नेहमीच उद्भवू लागली आहे. यातुनही राशन दुकानदार मार्ग काढून कार्ड धारकांना त्यांच्या हक्काचे राशन पुरविण्याचा कसोशिने प्रयत्न करतात.मात्र शासकीय स्तरावरुन देण्यात आलेले पाॅश मशिन कुचकामी ठरत असल्याने राशन दुकानदारांना कार्ड धारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता व पाॅश मशिनच्या चुकिमुळे मोठ्या प्रमाणात कार्ड धारकांना राशन मिळण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने राशन वितरण पाॅश मशिनच्या माध्यमातून बंद करून ऑफलाईन करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावेत; अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी देसाईगंज तहसीलदार प्रिती डुडुलकर,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,उपाध्यक्ष नितीन राऊत,युवा कार्यकर्ते पिंकु बावणे,माजी जिल्हा परिषद सदस्या जयमाला पेंदाम तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

