- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी व मजुरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.एकीकडे इंधन दरवाढीचा भडका उडाला असतांना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील मजुरी अजूनही त्याच दरात असल्याने मजुरांतून संताप व्यक्त केला जात आहे.वाढत्या महागाईत रोजच्या खर्चाचा ताळमेळ बसवतांना ग्रामीण भागातील कुटुंबांची मोठी कसरत सुरू असल्याने इंधन दरवाढीचा थेट परिणाम आता शेतीच्या कामांवर होणार असून नांगरणी, वखरणी,चिखलणी,कार्टिंग तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने होणाऱ्या सर्व कामांच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आधीच अवकाळी पावसाचा फटका,उत्पादन खर्चात वाढ आणि धानाला योग्य भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.त्यातच डिझेल दरवाढीमुळे शेती करणे आणखी महाग होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील ट्रॅक्टरधारकांनीही वाढत्या इंधन दरामुळे भाडेदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नांगरणीपासून धान वाहतुकीपर्यंत प्रत्येक कामासाठी शेतकऱ्याला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. ‘धानाला भाव नाही आणि खर्च मात्र दिवसेंदिवस वाढतोय,’ अशी खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.धान खरेदीसाठी मर्यादा वाढत नसल्याने कमी दरात धान विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.त्यातच खत,बियाणे,औषधांसह आता इंधन दरवाढीचा तडाखा बसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुन्हा संकटाच्या खाईत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
- Advertisement -

