उद्रेक न्युज वृत्त
पवनी(भंडारा) :-शेतात मशागतीच्या कामावरून पतीसोबत दुचाकीने परत येत असताना शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे दुचाकीवर हल्ला केला.यात शेतकरी महिला जखमी झाल्याची खळबळजनक घटना पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रातील चिचाळ चकारा पुलाजवळ घडली.सूर्यकांता गोपाल काटेखाये वय ४० वर्षे,रा.चिचाळ असे या जखमी महिलेचे नाव आहे.
अड्याळ-चिखली येथील शेती मशागतीची कामे सुरू आहेत.चिचाळ येथील गोपाल काटेखाये यांची शेती असून,शेती मशागतीची कामे आटोपून पती गोपाल काटेखाये सोबत दुचाकीने येत असताना अड्याळ चिचाळ मार्गावरील पुलाशेजारी दबा मारून बसलेली वाघाने दुचाकीवर हल्ला चढविला.यात सूर्यकांता ही खाली कोसळली. यात वाघाने तिच्या डाव्या पायावर व डाव्या हाताचे लचके तोडून जखमी केले.पतीने आरडाओरड केल्याने रस्त्याने जाणाऱ्यांनी वाघाच्या
दिशेने धाव घेतली.त्यानंतर वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला.गंभीर जखमी झालेल्या सूर्यकांताला ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे नेण्यात आले.घटनेची माहिती मिळताच वनविभाग अड्याळचे वनक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे कर्मचाऱ्यासह पोहोचून घटनास्थळाचा व ग्रामीण रुग्णालयात सूर्यकांता काटेखाये यांची भेट देऊन पंचनामा केला.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.सध्या शेतीच्या मशागतीचा काळ आहे.अशा दिवसात हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांनी सुरक्षेची मागणी वन विभागागाकडे केली आहे.

