- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
लातूर :-काही लोकं पैश्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात.पण,कुणी कितीही शातीर दिमाख वापरत असला तरीही तो खाकीचा तिसरा डोळा अन् त्यांच्या ॲक्शन मोडपासून स्वतःला बचावूच शकत नाही. अश्यातच लातूर जिल्ह्यात पैश्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या एका इसमाचे पितळ पोलिसांनी उघडले पाडले आणि तो तोंडाच्या भारावर जो पडला,तो थेट स्वतःच्याच जाळ्यात अडकला.लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील वानवडा पाटी ते वानवडा मार्गावर शनिवारच्या मध्यरात्री एका कारला आग लागली असल्याचा कॉल डायल ११२ वर पोलिसांना प्राप्त झाला.रात्री गस्तीवरील औसा ठाण्याचे अधिकारी, अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलालाही पाचारण करून आग आटोक्यात आणल्या गेली.कारमध्ये एक मानवी हाडाचा सांगाडा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला.यावरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करून जळालेल्या मृतदेहाचे जागेवर शवविच्छेदन करण्यात आले.त्यानंतर,
घटनास्थळावरील एमएच ४३ एबी ४२०० क्रमांकाच्या
कारचा पोलिसांनी शोध घेतला असता सदर कारचा मालक औसा तांडा येथील बळीराम गंगाधर राठोड असल्याचे समोर आले.सदरची कार ही मेहुणा गणेश गोपीनाथ चव्हाण रा.विठ्ठल नगर,औसा हा वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार गणेश चव्हाणचा शोध घेतला असता,तो शनिवार १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता मित्राला लॅपटॉप देण्यासाठी बाहेर पडला.तो घरी अजूनही परतला नाही आणि त्याचा फोनही बंद असल्याची माहिती पत्नीने दिली.सुरुवातीला पोलिसांना असे वाटले की कार मधील मृतदेह गणेश चव्हाणचा आहे,कारण जळालेली कार तोच चालवत होता.कुटुंबीयांनाही वाटले की गणेश एखाद्या अपघाताचा बळी ठरला आहे.लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले की,प्राथमिक तपासात मृत व्यक्ती गणेश चव्हाणच असल्याचे वाटले.पण,तपास जसजसा पुढे सरकला,तसतसा पोलिसांना जाणवू लागले की अनेक गोष्टी जुळत नाहीत.त्यांनी गणेश चव्हाणच्या आयुष्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली आणि त्यांना कळले की तो एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता.महिलेची चौकशी केली,तेव्हा कळले की घटनेनंतर गणेश चव्हाण तिला दुसऱ्या फोन नंबरवरून मेसेज करत होता आणि तिच्याशी चॅट करत होता.पोलिसांना जो माणूस मृत वाटत होता,तो जिवंत निघाला.आता पोलिसांना जाणून घ्यायचे होते की,कारमध्ये सापडलेला मृतदेह कोणाचा होता आणि त्यांनी चव्हाणच्या दुसऱ्या फोन नंबरचा मागोवा घेणे सुरू केले.यामुळे ते कोल्हापूर आणि नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे पोहोचले,जिथे गणेश चव्हाण सापडला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.चव्हाणची चौकशी केल्यावर पोलिसांना कळले की,त्याने १ कोटी रुपयांची जीवन विमा पॉलिसी घेतली होती आणि त्याला गृहकर्ज फेडण्यासाठी पैसे हवे होते.हे मिळवण्यासाठी त्याने एका खुनाचा कट रचला जेणेकरून तो स्वतःच्या मृत्यूचे नाटक करू शकेल.चव्हाणने औसा येथील तुळजापूर टी-जंक्शनवर गोविंद यादव नावाच्या एका व्यक्तीला लिफ्ट दिली.यादव नशेत होता आणि चव्हाणने याचा फायदा घेतला.ते एका ढाब्यावर थांबले आणि नंतर वनवाडा रोडकडे गेले.गाडी पार्क केल्यानंतर यादवने काही खाल्ले आणि लवकरच गाडीत झोपी गेला.नंतर चव्हाणने त्याला ड्रायव्हरच्या सीटवर ओढले,सीटबेल्ट लावला,सीटवर माचिसच्या काड्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या ठेवल्या आणि त्यांना आग लावली.याचबरोबर,चव्हाणने आपले ब्रेसलेट यादवजवळ सोडले.जेणेकरून पोलिसांना आपणच मृत पावलो आणि आपली १ कोटी रुपयांची
विमा पॉलिसी मिळावी,यासाठी गणेश चव्हाणने एवढे मोठे षडयंत्र रचले खरी,पण तो स्वतःच जाळ्यात अडकला.आरोपीची ओळख बँक रिकव्हरी एजंट गणेश चव्हाण अशी झाली असून काल सोमवारी पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
- Advertisement -

