उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने झाडीपट्टीतील ज्येष्ठ कवी, गायक व कव्वाल वामनदादा गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली, प्रसिद्ध स्तंभलेखक विनायक ऊईके यांचे उपस्थितीत नुकतेच कविसंमेलन घेण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी कवयित्री कुसुमताई आलाम,ज्येष्ठ कलावंत गोविंदराव बानबले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कवि संमेलनात झाडीपट्टीतील एकूण ६५ कवींनी भाग घेऊन उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या. यावेळचे नाट्यश्रीचे कविसंमेलन आगळेवेगळे होते. सर्व कविंना एक विषय देण्यात आला होता.तो विषय म्हणजे “जोडीदार”. प्रत्येक कवी/ कवयित्रींच्या आपल्या जोडीदारावरील प्रेम,भावना,चीड,राग-लोभ,आशा-अपेक्षा व्यक्त करणारे हे कविसंमेलन होते.विषय एक,संकल्पना एक,शिर्षक वेगळे,भावना वेगळ्या अशा या नाविन्यपूर्ण कविसंमेलनास ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच नवोदित कवींनी हजेरी लावून आपापल्या बहारदार रचना सादर केल्या व संमेलनात चांगलीच रंगत आणली.
भद्रावती येथील प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार प्रा. ज्ञानेश्वर हटवार यांच्या ‘प्रिये’ या प्रेमकवितेने संमेलनाची सुरुवात झाली.तर ब्रम्हपुरी येथील बाल कवयित्री जोशा भर्रे व जिज्ञासा भर्रे या भगिनींचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.ब्रम्हपुरीच्याच शिल्पा पाटील यांनी प्रसिद्ध कामगार कवी नामदेव ढसाळ यांना जोडीदार कल्पून सादर केलेल्या रचनेने संमेलनास वेगळाच रंग आणला.भंडारा येथील मेघा चेटूले यांनी ‘जिवलग’ तर गडचिरोलीच्या वंदना सोरते यांनी ‘त्याची ती जोडीदार ‘ सादर केली. पुन्हा भंडाऱ्याच्या हर्षा भुरे यांनी ‘जोडीदार’ तर चामोर्शीच्या भावना रामटेके यांनी ‘स्वप्न बघते तुजसंगे’ म्हणत नवोदित प्रेयसींना स्वप्नात घेवून गेल्या. गडचिरोलीच्या सुनीता आकनूरवार यांनी ‘अलवार नाते’ उलगडून दाखवले तर वंदना मडावी यांनी ‘ऋणानुबंध’ जपण्याचा प्रयत्न केला.डोंगरगावच्या बाळकृष्ण ठाकूर यांनी ‘लग्नगाठ’ बांधण्याचा प्रयत्न केला तर धानोऱ्याच्या सोपानदेव म्हशाखेत्री यांनी ‘सहचिरिणी’च्या भावना जपण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्ध कलावंत सुनील चडगुलवार यांनी त्यांच्या जीवनात लिहीलेल्या पहिल्याच ‘कवितेने प्रेमात पडलो केंव्हा’ या प्रश्नाची उकल केली,तर वडसा येथील नवोदित कवयित्री प्रियंका ठाकरे ने भावी ‘जोडीदाराकडून अपेक्षा’ व्यक्त केल्या.आयशा अलीची गझल बहारदार झाली तर भाजीपाला विकून कवीसंमेलनास आलेले कवी विलास जेंगठे यांनी ‘माझी जोडीदार ती’ कवितेद्वारे आपल्या जोडीदाराचे कौतुक केले.नुकतेच पतीचे निधन झालेल्या वर्षा गुरनुले या कविता सादर करतांना भावूक झाल्या आणि अक्षरशः संपूर्ण कवीमंच हळहळला.उपस्थित प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.गजानन गेडाम यांनी ‘ती’ सादर केली.नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी ‘यासाठी केला होता अट्टाहास’ सादर करुन त्यांची जोडीदार कुंदा यांच्यासह व्यतीत झालेल्या जीवनाविषयी आनंद व्यक्त केला.तर संमेलनाचे अध्यक्ष वामनदादा गेडाम यांनीही ते शिक्षक असून आपल्या अडाणी जोडीदारासोबत घालविलेल्या क्षणांची आठवण करून संपूर्ण कवीमंडळींना हसवून सोडले.
‘नाट्यश्री’ ने माझा योग्य तो सन्मान केला तसेच पारंपारिकतेला फाटा देऊन कायम स्मरणात राहील, असे वेगळे कवी संमेलन आयोजित केले.असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष वामनदादा गेडाम यांनी केले. तर ‘नाट्यश्री’ चे संमेलन दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असते,असे मत आदिवासी साहित्यिक कुसूमताई अलाम यांनी व्यक्त केले.या कविसंमेलनात ज्ञानेश्वर हटवार,जोशा भर्रे,जिज्ञासा भर्रे,शिल्पा पाटील,हर्षा भुरे, मेघा चेटूले, बाळकृष्ण ठाकूर,रेश्मा बावणे,वसंत ताकधट,उज्वला नगराळे,भावना रामटेके,प्रियंका ठाकरे,सुनीता आकनूरवार,वंदना सोरते,मंगला कारेकर,वंदना मडावी,रंजना चुधरी,सोपानदेव म्हशाखेत्री,लता शेंद्रे,स्वप्नील बांबोळे,भिमानंद मेश्राम, उपेंद्र रोहनकर,राजरत्न पेटकर,राजीव जुमळे,विलास जेंगठे,सुनील चडगुलवार,वसंत चापले,खेमदेव हस्ते, पुरुषोत्तम ठाकरे,तुळशीराम उंदीरवाडे,गजानन गेडाम, पुनाजी कोटरंगे,वर्षा गुरनुले,सुरेखा बारसागडे, मुरलीधर चुनारकर,नागोराव सोनकुसरे,निळकंठ रोहनकर,आयशा अली,विजया पोगडे,प्रशांत भंडारे, कुसूमताई अलाम यांचेसह नागपूर,भंडारा,गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली येथील ६५ कवींनी आपापल्या स्वरचित कविता सादर केल्या.
कवी संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन गजानन गेडाम यांनी केले.कवींचा व पाहूण्यांचा परिचय प्रा.अरुण बुरे यांनी करून दिला.तर संमेलनाची संपूर्ण जबाबदारी कविसंमेलन प्रमुख योगेश गोहणे यांनी सांभाळली. सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे गुणवंत शेंडे, मारोती लाकडे,निरंजन भरडकर,वसंत चापले,राजू चिलगेलवार,दादा चुधरी,दिलीप मेश्राम व राजेंद्र जरुरकर यांनी मेहनत घेतली.

