उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- लोकसभा निवडणूकीत गडचिरोलीचे विक्रमी ७२ टक्के मतदान हे जिल्ह्यातील नागरिकांचा लोकशाहीवर दृढ विश्वास दर्शवित असून गडचिरोलीकरांचा प्रतिकूल परिस्थितीतही मतदानाप्रती असलेला दृढ संकल्प देशभरातील नागरिकांना लोकशाहीची भावना जपण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल; असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४ वा वर्धापन दिन आज दिनांक -१ मे रोजी जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करतांना दैने बोलत होते.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह,जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल,सहायक जिल्हाधिकारी राहुल मिना,उपवनसंरक्षक मितेश शर्मा याप्रसंगी उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना तसेच जिल्ह्यातील शहिदांच्या पावन स्मृतीस जिल्हाधिकारी यांनी अभिवादन केले.तसेच शहीदांचे कुटूंबिय, स्वातंत्र्यसेनानी,लोकप्रतिनिधी,प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी,शेतकरी-बांधव,ज्येष्ठ नागरिक,सर्व जिल्हावासी आणि पत्रकार यांना महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते उत्कृष्ठ कामगिरी बजावलेले आमगावचे तलाठी कोंडीबा चाटे,पोलिस उपनिरीक्षक नथ्याबा बोडरे,पोलिस नायक रावजी हिचामी,रूषी विडपी, रुपेश म्हशाखेत्री यांचा सत्कार करण्यात आला. सुरवातीला परेड कमांडर धर्मेंद्र मडावी व सेकंड कमांडर सुरेश मडावी यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले.कमांडो सी-६०,महिला पोलिस, पोलिस मुख्यालय, गृहरक्षक दल, बँड, डॉग स्कॉड, बिडीडीएम आदि पथकांनी संचलन करून मानवंदना दिली.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी एस.आर.टेंभुर्णे यांचेसह जिल्हा व पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

