उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली (भामरागड) :- तालुक्यातील मर्दहूर गावातील २६ वर्षीय निष्पाप मुलाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याने मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आई- वडील व दोन भावंडांनी टाहो फोडला.आमच्या निष्पाप लेकराची काय चूक.त्याला का म्हणून मारले, असे म्हणत आई-वडिलांसह नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.त्यामुळे भामरागड ग्रामीण रुग्णालय परिसरातील वातावरण सुन्न झाले होते.
सदर घटना ९ मार्च २०२३ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तीन नक्षली वेशभूषेत आले.शेतात काम करीत असतांना बोलण्यासाठी म्हणून साईनाथ ला गणवेशातील तीन नक्षली दूर घेऊन गेले.बराच वेळ होऊनही तो परतलाच नाही.काही वेळाने एका शेतकऱ्याने मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली,त्यानंतर साईनाथ नरोटीच्या कुटुंबाने तिकडे धाव घेतली.मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून नक्षल्यांनी गोळ्या झाडून संपविले असल्याचे उघडकीस आले.
साईनाथ चैतू नरोटी वय २६ वर्षे असे दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे.साईनाथ पदवीच्या अंतिम वर्षात शिकत होता.चैतू नरोटी हे भामरागड तालुक्यातील मरदुर येथील रहिवासी असून गावातील सधन शेतकरी म्हणून त्यांचा समावेश आहे.त्यांचा मुलगा लहानपणापासूनच हुशार होता.त्याला आई- वडिलांनी जिद्दीने शिकवले.साईनाथ होळीला गावी आला होता. त्याला परत जायचे होते; पण आई-वडिलांसह शेतात गेला आणि नक्षल्यांचा शिकार झाला.