उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे.दुपारच्या वेळी शहरी व ग्रामीण भागांत जाऊन वयोवृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर टोळीचा भर असतो.सोने- चांदीचे दागिने चमकविण्याचा दावा करून टोळीतील लोक ‘हातचलाखी’ करून लाखो रुपयांचे दागिने लंपास करीत असतात.
संबंधित टोळीचे सदस्य एखाद्या पावडर कंपनीचे नाव सांगून घरात प्रवेश करतात.साधारणतः दुपारच्या सुमारासच हे लोक येतात.विशेषत: ज्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा महिलाच असतात अशी ठिकाणे शोधून टार्गेट करीत असतात.अगोदर भांडी चमकवून देण्याचा दावा करीत ‘डेमो’ देतात.यादरम्यान त्यांच्याजवळील ‘केमिकल व खऱ्या पावडरचा उपयोग करून ते खरोखर संबंधित भांडी चमकवून देतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचादेखील विश्वास बसतो. त्यानंतर हे लोक एखादे चांदीचे लहानसे भांडे मागतात व त्यालादेखील काही वेळात डोळ्यासमोर चमकवून देतात.साहजिकच समोरील व्यक्तीचा विश्वास आणखी वाढतो व त्यानंतर सोने-चांदीचे दागिनेदेखील त्यांना देण्यात येतात.येथूनच टोळीचा खरा खेळ सुरू होतो.लाल रंगाची पावडर पाण्यात टाकून ते मिश्रण तयार करतात व त्यात दागिने टाकतात.त्यानंतर एखाद्या डब्यात किंवा भांड्यात ते पाणी व दागिने टाकून ते गॅसवर गरम करायला सांगतात व पाच मिनिटांनी दागिने पाण्यातून बाहेर काढण्याची सूचना करतात.समोरील व्यक्ती त्यात व्यस्त असतांना हे लोक घरातून काढता पाय घेतात.पाच मिनिटांनंतरच आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येते.मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो.
‘उजाला’, ‘पतंजली’चे प्रतिनिधी असल्याचा करतात दावा
अगोदर हे आरोपी संबंधित भागाची रेकी करतात.दुपारची वेळ पाहून घरासमोर जाऊन आवाज देतात किंवा बेल वाजवितात, ‘उजाला’ किंवा ‘पतंजली’ या कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात.सर्व्हे सुरु असल्याचे सांगत मोफत भांडे चमकवून देण्याची बतावणी करीत असल्याने; अशांपासून सावध रहावे.
सोने-चांदी -पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश ‘गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे.आपल्याही परिसरात केव्हाही दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशांपासून सतर्कता बाळगावी.

