उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ग्रामीण भागातील सिमेंट-काँक्रीट रस्त्यांची अवस्था दयनीय स्वरूपाची झाली असल्याने या कामांवर लाखो रुपये खर्च करूनही जैसे थे अवस्था पहावयास मिळते.
वारंवार गावातील रस्ते बांधकामांवर रक्कम खर्ची पडू नये याकरिता सध्या स्थितीत सगळीकडेच सिमेंट-काँक्रीट रस्त्यांचे बांधकामे करण्यात येतात.सिमेंट-काँक्रीट रस्ते बनविण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मजबुती व जास्त काळ टिकाऊ असतात.मात्र ग्रामीण भागातील सिमेंट-काँक्रीट रस्त्यांचा विचार करता व प्रत्यक्षात पाहणी केली असता वेगळीच परिस्थिती पहावयास मिळाली.रस्त्यांचे बांधकामे करतांना असे वाटते की जवळपास पाच वर्ष तरी सिमेंट-काँक्रीट रस्त्यांना काहीही होणार नाही.या रस्त्यांवरून जड वाहतुक वा इतर वाहतुक केली तरी काहीही फरक पडणार नाही असे सर्वच गावातील नागरिकांना वाटत असते.
सिमेंट-काँक्रीट रस्ते पाच वर्षे तर सोडा दीड ते दोन वर्षातच यांचा कायापालट झालेला दिसून येत आहे. या रस्त्यांवरील सिमेंट एकीकडे,रेती एकीकडे व गिट्टी तर डोके वर काढून पाहू लागते.याचे मुख्य कारण म्हणजे बांधकामांवर वापरण्यात येणारे साहित्य योग्य प्रमाणात वापरलेच जात नसल्याने सगळीकडे पसारा झाल्यासारखे दिसून येते.एखाद्या नागरिकाने उचल केली तर त्याला दाबण्याचा प्रयत्न बांधकाम करणारे करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शासन स्तरावरून रस्ते बांधकामाकरिता लाखो रुपये गावच्या विकासासाठी दिले जातात.मात्र या लाखो रुपयांचा विनियोग योग्य प्रकारे होत नसल्याने भ्रष्टाचार वाढीस प्रेरणा मिळून अर्धी रक्कम खर्ची व काही रक्कम घशात अशी अवस्था झाली आहे. त्यामुळेच सिमेंट-काँक्रीट रस्ते केवळ नामधारी व देखाव्या सारखे दिसून येतात.सिमेंट-काँक्रीट रस्त्यांची दयनीय अवस्था होऊ नये याकरिता रस्ते बांधकामांवर साहित्यांचे योग्य प्रमाण वापरून रस्ते जास्त काळ टिकावे असे ग्रामीण भागातील नागरिकांनी मागणी केली आहे.