उद्रेक न्युज वृत्त
बुलढाणा :- सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत.यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियान राबवण्याकडे शिक्षण विभागाने भर दिला आहे.मात्र बुलढाण्यात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. सातत्याने बारावीच्या पेपरात गंभीर चुका होत असल्याचे समोर येत असताना बुलढाण्यात गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच फुटला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
पेपर फुटी प्रकरणामध्ये दोन शिक्षकांना अटक केली आहे.शिक्षकांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवून पेपर व्हायरल केला असल्याचे समोर आले आहे.ग्रुपमध्ये एकूण ९९ जणांचा समावेश होता.पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेतले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.परीक्षेत गैर प्रकार करण्यासाठी कट रचला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी बारावीच्या गणिताचा पेपर सुरू होणार होता; मात्र त्याआधीच सिंदखेड राजा तालुक्यात साडेदहा वाजता सोशल मीडियावर गणिताचा पेपर येऊन धडकला.गणिताचा पेपर फुटला असल्याची बोंब पेपर सुरू होण्या आधीच उठली. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले होते.बारावीच्या परीक्षेत शिक्षण विभागाच्या सातत्याने चुका समोर येत आहेत.त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभाग उच्च माध्यमिक शिक्षण विभाग बारावीच्या परीक्षा घेताना किती जबाबदारीने वागतात ते सिद्ध होत आहे.बुलढाण्यात पेपर सुरू होण्याआधीच पेपर फुटला.अशा सातत्याने होणाऱ्या चुकांना नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न पडला आहे.