उद्रेक न्युज वृत्त
नाशिक :- पाहिजे त्या प्रमाणात शेत मालाला भाव मिळत नाही.कितीही राबून कर्जाचे डोंगर उभे येऊन ठाकले आहे.कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी अवकाळी पाऊस,गारपीट व इतर समस्यांना शेतकरी बांधवांना सामोरे जावे लागत आहे.अशातच शेत मालाच्या पिकांचे उत्पादन चांगले झाल्यास योग्य भाव मिळत नसल्याने काल सोमवारी गावातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली.माळवाडी गावातील ९५ टक्के शेतकरी हे कांदा उत्पादक आहेत.याशिवाय नगदी पिक म्हणून काही जण भाजीपालाही लावतात.मात्र,गावकरी घेत असलेल्या कोणत्याही पिकाला गेल्या ३ ते ४ वर्षांत योग्य भाव मिळाला नाही,असा मुद्दा ग्रामस्थांनी मांडला.गावातील सर्व कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन शेती आहे. मात्र,शेतीमालाला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहासाठीही पैसे राहत नाही.आरोग्य,शिक्षण,लग्न आणि दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाच शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून मिळत नाही.त्यामुळे हे गावच विकावे व त्यातून पैसे मिळावेत; असा ठराव ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या सभेत राज्य सरकारकडे काही मागण्याही करण्यात आल्या.पुर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या किमान गरजा पूर्ण व्हाव्यात आणि कर्जफेड करता येईल,इतपत त्याच्या मालाला भाव मिळावा; अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली. सरकारने आमच्या मागण्यांची गंभीर दखल घ्यावी. शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे,ते सरकारनेच विकत घ्यावे; अशी मागणी देवळा तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे.