उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अतिसार आजारामुळे होणारे बालमृत्यु शून्यावर पोहोचविणे हे शासनाचे ध्येय असून यासाठी जिल्ह्यात ६ जून ते २१ जून २०२४ या कालावधीत ‘अतिसार नियंत्रण पंधरवडा’ मोहिम प्रभावीपणे राबवण्याच्या सुचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गोकुळनगर येथे आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांच्या हस्ते अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले.पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांना काळजी घेणाऱ्यांचे योग्य समुपदेशन करावे,अति जोखमीचे क्षेत्र आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष देण्याच्या सुचना शिंदे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या.
उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये पूर व नैसर्गिक आपत्ती दरम्यान अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारची पूर्व तयारी आहे. अतिसार असलेल्या ० ते ५ वयोगटातील सर्व मुलांना ओ.आर.एस.आणि झिंक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरामध्ये ओआरएस व झिंक चा वापर तसेच उपलब्धता वाढवणे,अतिसारासह जलशुष्कता असलेल्या बाल रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे,शहरी झोपडपट्टया,पूरग्रस्त भाग,आरोग्य सेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे,भटक्या जमाती,वीटभट्टी कामगार, स्थलांतरीत मजूर आणि बेघर मुले आदी जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे,मागील २ वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेले क्षेत्र यावर विशेष लक्ष देणे, हे धोरण आरोग्य विभागाने निश्चित केले आहे.
जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ प्रफुल्ल हुलके,अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमित साळवे,डॉ.राहुल थिगळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, शंतनु पाटील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, प्रविण गेडाम विस्तार अधिकारी,डॉ.सिमा गेडाम वैद्यकिय अधिकारी,डॉ.पल्लवी गावंडे पी.एच.एम. व सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केद्र कर्मचारी, आशा वर्कर व लाभार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.

