- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मागील काही वर्षात गडचिरोली जिल्ह्यात ‘जे आले ते हात साफ करूनच गेले’,अशी म्हणण्याची वेळ आली होती.यापूर्वी ना चौकशी लागायची,ना कुणाला फुरसत मिळायची.सर्वजण आपल्याच धुंदीत मग्न असायचे.लड्डू गोपालसारखा गोपालकाला फुटायचा. मात्र,आता मागील काही महिन्यांपासून प्रशासन तात्काळ ॲक्शन मोडवर येत असल्याने काही कां असेना, जिल्ह्यात काही प्रमाणात तरी बदलाचे संकेत दिसून येऊ लागले आहेत.अश्याच प्रकारे ज्यांनी अवैध कामांमध्ये साथ दिली,अश्यांची आता उचलबांगडी होणार असल्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावणाऱ्यांची अवस्था पाहण्यालायक होणार आहे.त्यातच कोट्यवधी रुपयांच्या अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून आता वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी
उत्खनन करण्यात आलेल्या जागांची ईटीएस मशिनद्वारे म्हणजेच जमिनीची मोजणी करणाऱ्या उपकरणाद्वारे मोजणी करण्यात येणार असल्याने ‘वैध की अवैध’ याची खात्री होणार आहे व त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
नवीन रेल्वे मार्ग बांधकामासाठी मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन केल्याची तक्रार ग्रामपंचायत खांबाळा येथील
माजी सरपंच नंदकिशोर शेडमाके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.तक्रारीत पोर्ला महसूल मंडळ व वनपरिक्षेत्रातील पोर्ला,वसा,वसा चक येथील दोन्ही विभागांच्या जमिनीतून १० पोकलँड व ३० हायवाच्या माध्यमातून दररोज दिवस-रात्र हजारो ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.त्यानुसार सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी गंभीर प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपविभागीय अधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.उपविभागीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला.त्यानुसार आता उत्खनन करणाऱ्या कंपनीने रॉयल्टीच्या(स्वामित्व हक्क) प्रमाणात मुरुमचे उत्खनन केले की,त्यापेक्षा जास्तीचे उत्खनन केले,हे ईटीएस मशिनद्वारे उत्खनन झालेल्या जागांची मोजणी केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे येत्या काळात ‘ॲक्शन की रक्षण’ हे लवकरच कळणार आहे.
- Advertisement -

