उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/ सत्यवान रामटेके
गडचिरोली(आरमोरी) :- जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक(SP) नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्याचा पदभार सांभाळताच सर्वप्रथम अवैध धंद्यांवर अंकुश घालण्यासाठी स्वतः कंबर कसली होती.त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील पोलीस प्रशासनास फर्मान सोडून अवैध धंदे करणाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते.अशातच पाच ते सहा महिने सट्टा-पट्टी व्यवसायावर मंदीचे सावट ओढवले होते.सोबतच जिल्ह्यातील संपूर्ण सट्टा-पट्टी बंद करण्यात आली होती.मात्र हल्ली आरमोरी शहर व तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावली असल्याचे दिसून येत आहेत.यामध्ये अवैध दारू विक्री बरोबरच बंद असलेले अवैध धंदे पुन्हा सुरू झाली आहेत.अशातच आरमोरी शहरा सोबतच तालुक्यातील ग्रामीण भागात व्हॉट्सअपद्वारे सट्टा-पट्टीचा व्यवसाय जोमात सुरू झाला असल्याने पोलीस अधीक्षकांच्या सूचनेला काळे फासले जात असल्याचे दिसून येत आहे.
सध्याच्या घडीला ‘धंदा है पर मंदा है’ अशी सट्टा-पट्टी व्यवसायाची जरी अवस्था असली तरीही सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणावर कात्री लागत असल्याचे वास्तव चित्र निदर्शनास येऊ लागले आहे.लहान मुलांपासून ते वयोवृद्ध सट्टा-पट्टीच्या आहारी जाऊ लागले आहेत.अशातच मालक एक तर गाडी हाकणारे चालक अनेक अशी अवस्था निर्माण झाली आहे.
काहीजण भाड्याच्या खोलीत तर काहीजण स्वतःच्या राहत्या घरी तर काहीजण पानठेले तर काहीजण इतर ठिकणांहून चीटोरा न देता नवनवीन फंडे वापरून व्हॉट्सअपद्वारे अवैध सट्टा-पट्टीचा व्यवसाय राजरोसपणे खुलेआम आरमोरी शहर तसेच ग्रामीण भागात अधिक जोमाने सुरू आहे.अशांवर अंकुश घालण्यास संबंधित विभाग एवढी चुप्पी कां बरं साधित आहे; हे अनेकांना कळेनासे झाले आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी कारवाईचा बडगा उगारताच अनेक मोठ-मोठे सट्टा-पट्टी व्यावसायिक भूमिगत होऊन सहा महिने लुका-छुपी करून खेळ करू पाहत होते.मात्र पोलीस अधीक्षक यांचेसमोर कुणीही तग धरू शकले नाहीत.मात्र हल्ली हळू-हळू अवैध सट्टा-पट्टी डोके वर काढून पाहू लागल्याने काही खिसे तर गरम होत नसावे ना..? असे दबक्या आवाजात सुर निघू लागले आहेत.त्यामुळे आरमोरी शहर तसेच ग्रामीण भागातील अवैध सट्टा-पट्टीला लगाम लावणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.