- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नशिबाचा खेळ हा न्याराच म्हणावा लागेल.पण,नशीब फडफडायला त्याप्रमाणे कार्यही करणे तितकेच महत्वाचे आहे.नाहीतर ‘दे गा हरी अन् पलंगावरी’ असे केल्याने होत नाही,तर ‘केल्याने होत आहे रे,आधी केलेची पाहिजे’ या म्हणीप्रमाणे कालपर्यंत उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांच्या घरी जाऊन झाडू मारणे, फरशी पुसणे आणि धुणी-भांडी करणाऱ्या कल्पिता माझी आता लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाऊल ठेवणार आहेत.काल सोमवारी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.त्यात कल्पिता माझी ह्या १२ हजार ५३५ मतांनी विजयी झाल्या.कल्पिता यांच्या पारड्यात तब्बल १ लाख ७ हजार ६९२ मते पडली.पश्चिम बंगालच्या औशग्राम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्यांनी मिळवलेला विजय हा केवळ एका जागेचा विजय नसून, संघर्षाचा विजय मानला जात आहे.विशेष म्हणजे, घराणेशाही आणि धनशक्तीच्या जोरावर चालणाऱ्या राजकारणाला पश्चिम बंगालमध्ये एका सामान्य महिलेने जोरदार चपराक दिली आहे.
पश्चिम बंगालच्या गुस्करा नगरपालिकेतील एका छोट्या घरात राहणाऱ्या कल्पिता माझी या चार घरांची कामे करून महिन्याला अवघे अडीच हजार रुपये कमवत होत्या.त्यांचे पती ड्राय क्लीनर म्हणून काम करतात. गरिबीचा डोंगर समोर असतांनाही कल्पिता यांनी कधीही हार मानली नाही.२०२१ च्या निवडणुकीतील पराभवानंतरही त्या खचल्या नाहीत.उलट त्यांनी आपला जनसंपर्क अधिक वाढवला.२०२१ मध्ये पहिल्या प्रयत्नात पराभव पत्करावा लागला,मात्र कामात खंड पडू दिला नाही.यावेळी भाजपने पुन्हा विश्वास दाखवल्यावर कल्पिता माझी यांनी प्रतिस्पर्धी श्यामा प्रसन्ना लोहार यांचा १२ हजार ५३५ मतांनी पराभव केला.कोणताही गाजावाजा किंवा मोठ्या गाड्यांचा ताफा न करता कल्पिता माझी अतिशय साध्या वेशात घरोघरी फिरल्या. “मी तुमच्यातीलच एक आहे,” हा त्यांचा साधेपणा मतदारांच्या मनाला भिडला आणि जिद्द घेऊन मैदानात उतरलेल्या एका कष्टकरी महिलेने आज आमदारकीचा मोहोर उमटवत देशासमोर एक नवा आदर्श ठेवला.
- Advertisement -

