उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- शासनातर्फे शहरी तसेच ग्रामीण भागात ‘स्वच्छ भारत मिशन’ राबवून जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला घरोघरी शौचालय संकल्पना राबवून काहींना शौचालय बांधून देण्यात आले.तर काहींनी स्वतः बांधकाम करून योजनेचा लाभ घेतला आहे.मात्र,आजही घरात शौचालय असताना गावखेड्यांत महिला,पुरुष हे उघड्यावर शौचास जाताना दिसतात.तर शौचालयात काड्या,गोवरी इत्यादी साहित्य ठेवलेले आढळून येते. परिणामी ग्रामीण भागात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
गतकाळात शासनाने हागणदारीमुक्तीचा नारा देत सर्वत्र जनजागृती केली.जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे, या दृष्टीने ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे पटवून देण्यात आले.शासनाने कोणीही उघड्यावर शौचास जाऊ नये; यासाठी प्रत्येक कुटुंबाला शौचालयासाठी अनुदान उपलब्ध करून दिले.तसेच ग्रामीण भागात पंचायत समिती व ग्रामपंचायतींतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.गुड मॉर्निंग पथके नेमण्यात आली.या पथकांद्वारे रोज फेरफटका मारून जनतेमध्ये जनजागृती करीत आवश्यक सूचना केल्या.
त्यासाठी हागणदारीमुक्त गावांना पुरस्कृतही करण्यात आले.पण हे अभियान काही दिवसांपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसून येते.त्यामुळे सदर बाबीची दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

