उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- खरीप हंगामासाठी केंद्र शासनाने साधारण धानाला २०४० रुपये व ‘अ’ श्रेणी धानाला २०६० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला.परंतु, हमीभावापेक्षा धानाला उत्पादन खर्च अधिक येत असल्यामुळे तसेच यंदा झालेल्या अतिवृष्टी,नैसर्गिक आपत्ती व कोरोना महामारी प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अडचणीत सापडलेल्या राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यावे; अशी मागणी शेतकऱ्यांसह राजकीय पक्ष,विविध संघटनांनी शासनाकडे केली होती.या अनुषंगाने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी १५ हजार रूपये बोनस देण्याची घोषणा केली होती.२४ फेब्रुवारी रोजी शासनाच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने धान उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १५ हजार रूपये बोनस देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.त्यानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी बोनस जाहीर केला आहे.मात्र यासाठी ई-पीक ॲपवर पिकांची नोंदणी असणे आवश्यक आहे.काही शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी करूनही नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना आता बोनसला मुकावे लागणार आहे.