उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २०२२-२३ अंतर्गत सरपंचांचे चार दिवसीय पायाभूत प्रशिक्षण चंद्रपूर येथे ९ ते १२ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले.पंचायत समितीने त्यासंदर्भात देवरी तालुक्यातील १६ सरपंचांना निमंत्रण दिले.१५ महिला आणि एक पुरूष सरपंच जाण्याकरिता निघाले.मात्र अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर आयोजकांनी प्रशिक्षक आले नसल्याने प्रशिक्षण रद्द करण्यात आल्याचे कळविले.त्यामुळे त्या सरपंचांना अर्ध्याच रस्त्यातून परत यावे लागले.यामुळे शासकीय कार्यक्रमांच्या नियोजनाचे पितळ उघडे पडले आहे.
चंद्रपूर येथील वन प्रबोधिनी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २०२२-२३ अंतर्गत सरपंचांकरिता ४ दिवसांचे निवासी क्षमता बांधणी उजळणी,पायाभूत प्रशिक्षण ९ ते १२ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.प्रशिक्षणात सरपंच पदाची कार्ये, जबाबदारी,गावाचा सर्वागिण विकास आदी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार होते.त्याकरिता जिल्हा परिषदेने दिलेल्या सूचनेनुसार पंचायत समितीने देवरी तालुक्यातील १४ सरपंचांची निवड केली.त्यात मुरपार,चिचेवाडा,फुक्कीमेटा,ढिवरीनटोला,ओवारा, भागी,पुराडा,डोंगरगाव,पिपरखारी,चिचगड,पळसगाव, शेडेपार जेठभावडा,मुल्ला,पलानगाव आणि वांढरा या १६ सरपंचांना आमंत्रित करण्यात आले होते.यात एका पुरुषाचा देखील समावेश होता.आपल्याला उपयुक्त माहिती मिळणार असल्याने सरपंच देखील जाण्यास तयार झाले.सर्व सरपंच खासगी वाहनाने चंद्रपूरला जाण्याकरिता निघाले.परंतु,अर्ध्या रस्त्यात त्यांना प्रशिक्षण रद्द करण्यात आल्याची सूचना देण्यात आली.त्यामुळे सर्व सरपंच माघारी परतले.उल्लेखनीय म्हणजे नियोजन करतांना आयोजकांनी काळजी का घेतली नाही.सरपंचांना नाहक त्रास देण्याचे कारण काय? असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे.